निधी विना रखडलं बहिणाबाईचं स्मारक
जळगावला महाविद्यालयात जायला निघालेल्या विद्यार्थिनींना म्हटलं, ''तुम्ही बहिणाबाईच्या गावच्या, त्यांची एखादी कविता सांगता?'' बिचाऱ्या थोडया अडखळल्या, पण बोलल्या. ''काळया काळया मातीत...'' मी म्हटलं, ''माफ करा, ही कविता बहिणाबाईंची नाही. विठ्ठल वाघांची.'' मग लगेच सावरत त्यांनी 'अरे संसार संसार'च्या दोन ओळी म्हटल्या. जगण्याचं तत्त्वज्ञान आपल्या कवितेतून मांडणाऱ्या बहिणाबाईच्या माहेरच्या लेकींचा बहिणाईशी फारसा परिचय नाही, हे जाणवलं. ''आसोद्यात बहिणाबाईचं स्मारक होतंय, माहितीय का?'' उत्तर नकारार्थी येतं. कदाचित आपल्याच व्यापात गुरफटल्याने त्यांचं तसं होत असावं.
बहिणाबाई स्मारकाला निधीची प्रतीक्षा
स्रोत: विवेक मराठी 22-Jun-2015
 सा. विवेक
***चिंतामण पाटील****
माझी माय सरसोती
माले शिकवते बोली
लेक बहिणाईच्या पोटी
किती गुपित पेरली.
जळगावहून आसोद्याला जायला निघालो, तेव्हा बहिणाबाईच्या अशाच काही कवितेच्या ओळी आठवू लागलो. आसोदा बहिणाबाईचं माहेर नि जुनं जळगाव सासर. सासर-माहेरचं अंतर जेमतेम 5 किलोमीटरचं. सासरहून माहेराला निघतानाच्या वाटेचं वर्णन बहिणाबाईंनी आपल्या कवितेत केलंय. बाऱ्याचा मया (मळा) म्हणजे पानमळा, रेल्वे फाटक, लेंडी नाला, खारी डोम, हाय (पाण्याचा हाळ) ही ठिकाणं मी नजरेने शोधत आसोद्याकडे निघालो. जळगावच्या आजूबाजूला तेव्हा पानमळे असतील, पण आज पानमळे दृष्टीस पडेनात. त्यामुळे बाऱ्याचा मया काही मला दिसला नाही. पण जळगाव सोडलं की काळा कुळकुळीत लेंडी नाला अर्ध्या वाटेपर्यंत आपली सोबत करतो. गावात शिरण्याआधीच हाय (हाळ)जवळ कापडं धुणाऱ्या बाया नजरेस पडल्या. आपल्या माहेराचं बहिणाबाईला मोठं कौतुक. पण आज पाण्याच्या रिकाम्या प्लास्टिक पिशव्यांनी गच्च भरलेलं गटार आपलं स्वागत करतं. मोठया पटांगणातलं खंडेरायाचं मंदिर आसोद्याची शानच. बाजूला जुनी मराठी शाळा.. असंच काहीबाही जुनी ओळख राखून असलेलं गाव. जिथे रिक्षा, बसेस थांबतात तिथे थांबून बहिणाबाईच्या माहेरच्या लेकींना बहिणाबाई किती आठवते याची चाचपणी करायचा हेतू माझ्या मनात जन्माला आला. जुन्या प्राथमिक शाळेच्या भिंतीला खेटून उभ्या असलेल्या, जळगावला महाविद्यालयात जायला निघालेल्या विद्यार्थिनींना म्हटलं, ''तुम्ही बहिणाबाईच्या गावच्या, त्यांची एखादी कविता सांगता?'' बिचाऱ्या थोडया अडखळल्या, पण बोलल्या. ''काळया काळया मातीत...'' मी म्हटलं, ''माफ करा, ही कविता बहिणाबाईंची नाही. विठ्ठल वाघांची.'' मग लगेच सावरत त्यांनी 'अरे संसार संसार'च्या दोन ओळी म्हटल्या. जगण्याचं तत्त्वज्ञान आपल्या कवितेतून मांडणाऱ्या बहिणाबाईच्या माहेरच्या लेकींचा बहिणाईशी फारसा परिचय नाही, हे जाणवलं. ''आसोद्यात बहिणाबाईचं स्मारक होतंय, माहितीय का?'' उत्तर नकारार्थी येतं. कदाचित आपल्याच व्यापात गुरफटल्याने त्यांचं तसं होत असावं.
आसोदा गावाच्या बाहेर पूर्वेला भादली रस्त्याला लागून डाव्या हाताला 1 हेक्टर 16 आर जागेवर बहिणाबाईंचं स्मारक आकार घेतंय. सार्वजनिक कामाच्या कोनशिलेवर शेवाळं चढवायची शासकीय रीत. ठरलेल्या कालावधीत काम पूर्ण व्हायची पाटी तर लागते, पण निधीचा झरा मात्र आटलेला. अशीच एक पाटी आसोद्यात बहिणाबाईंच्या स्मारकाच्या आवारात लावली आहे. बहिणाबाईंचं स्मारक उभारणी, कालावधी 24 महिने. भंडारी ब्रदर्सकडे बांधकामाचा ठेका आहे. प्रारंभीचा खर्च सुमारे पाच कोटी होता. पण तो आता वाढणार आहे. कारण येत्या नोव्हेंबरात हे काम आटोपायला हवं होतं. ते 10 टक्केही झालेलं नाही. आघाडी सरकारच्या काळात मंत्रिपदावर असलेल्या गुलाबराव देवकर यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या भव्य स्मारकाला सरकारदरबारी मंजुरी मिळवली. सामाजिक उपक्रम राबवणारी 'निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी विकास मंच' नावाची एक संस्था आसोद्यात कार्यरत आहे. या संस्थेने बहिणाबाईंच्या भव्य स्मारकासाठी सातत्याने प्रयत्न चालवले होते. किशोर चौधरी या संस्थेचे अध्यक्ष. त्यांना विचारपूस केल्यावर कळलं की वर्ष उलटलं, स्मारकाचं काम निधीअभावी थांबलंय. आणखी किती दिवस थांबणार? सांगता येत नाही. सप्टेंबर 2013मध्ये स्मारकाचा प्रकल्प आराखडा मंजूर झाला. 4 कोटी 95 लाख रुपये इतकी रक्कम स्मारकासाठी मंजूरही झाली. स्मारक पूर्णत्वासाठी 24 महिन्यांचा कालखंड ठरला. जिल्हा नियोजन मंडळाने प्रारंभीच्या बांधकामासाठी 2 कोटी रुपये द्यावेत, असं ठरलं होतं. भंडारी बिल्डर्सने आराखडयानुसार बांधकामाला प्रारंभही केला. परंतु कामाला प्रारंभ होऊन आता अठरा महिने उलटले, तरी अद्याप निधी मिळालेला नाही. प्राथमिक स्वरूपाचं बांधकाम झालंय, वाळूचे ढिगारे पडलेत, कुठे कुठे काटेरी बाभळीची झाडं दिसू लागली आहेत. काम पूर्णपणे थांबलेलं आहे.
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार सत्तेवर असताना स्मारकाला जशी मंजुरी मिळाली, तसा स्मारकाच्या कामात खोडाही त्याच सरकारच्या काळात घातला गेला. तत्कालीन शासनाने एका परिपत्रकाद्वारे 'यापुढे राज्यात कुठेही थोर पुरुषांचं स्मारक शासनाच्या पैशातून होऊ नये' असं जाहीर करण्यात आलं. बहिणाबाईंचं स्मारक त्याला थोडंच अपवाद ठरणार? शासनाचा आदेश जिल्हा नियोजन मंडळापर्यंत पोहोचल्याने स्मारकासाठी उपलब्ध असलेले 2 कोटी देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अनुत्साह दाखवला. हा सगळा घटनाक्रम घडला, तो राज्यात आघाडी सरकार सत्तेवर असतानाच.
'लपे करमाची रेखा' या आपल्या कवितेत बहिणाबाईंनी म्हटलंय,
देवा तुझ्याबी घरचा
झरा धनाचा आटला
धनरेखाच्या चऱ्याना
तयहात रे फाटला
आता शासन नावाच्या अजब गारुडयाने स्मारक तर मंजूर केलं, पण पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. परिणामी स्मारकाचं बांधकाम थांबलं. ठेकेदाराला झाल्या कामाचे पैसे न मिळाल्याने गेल्या वर्षभरापासून काम रखडलेलंच आहे.
पूर्वीच्याच शासनाने निधीचे दार बंद केल्याने स्मारकासाठी आता कोणत्या मार्गाने निधी मिळणार ही चिंता उभी राहिली. आजवर प्राथमिक स्वरूपाच्या कामासाठी भंडारी ब्रदर्सने सुमारे 1 कोटी 30 लाख रुपये खर्च केले आहेत. परंतु स्मारकांना निधी न देण्याच्या शासनाच्या निर्णयाने नवंच संकट उभं राहिलं आहे. कारण आता स्मारकाच्या कामाचा खर्च 10 कोटीच्या घरात पोहोचला आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत याबाबतीत चर्चा होऊन यंदा नियोजन मंडळाने 2 कोटी रुपये द्यावेत असं जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथराव खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे. सुमारे 5 कोटी रुपये स्मारकासाठी यापूर्वीच मंजूर झाले असून बांधकाम विभागाने स्मारकाच्या कामाचं पुन्हा पुनर्मूल्यांकन (रिव्हॅल्यूएशन) करून 30% रकमेची वाढ केली आहे. मात्र 2 कोटी नियोजन मंडळाने व त्यापुढे लागणारा खर्च राज्य सरकारने उचलावा, असं ठरलं आहे.
जळगावपासून 5 कि.मी. अंतरावर असलेल्या आसोद्यात हे भव्य स्मारक होत आहे. आणखी काही दिवसात हे अंतर उरणार नाही. आसोद्याचं गावपण जळगावात विलीन होईल, तेव्हा बहिणाबाईचं आसोदं स्मारकाच्या रूपाने जिवंत राहणार आहे. बहिणाबाईंचं काव्य जसा एक खजिना आहे, तसं बहिणाबाईचं स्मारक खान्देशवासीयांसाठी ऐतिहासिक ठरायलं हवं. ह्या स्मारकाच्या माध्यमातून भावी पिढीला बहिणाबाई समजाव्यात, यासाठी या ठिकाणी विविध सोयी असतील. बहिणाबाईंचा भव्य पुतळा, ऍम्फीथिएटर, तारांगण, बहिणाबाईंच्या वापरातल्या विविध वस्तूंच्या प्रतिकृती, बहिणाबाईंचा कवितासंग्रह लोकांना कमी दरात उपलब्ध करून देणे, खान्देशी खाद्यपदार्थ असलेले उपाहारगृह आदी. एकूण या स्मारकाला पर्यटनस्थळाचा आकार मिळावा, असा आमचा हेतू असल्याचा मनोदय बहिणाबाई विकास मंचचे किशोर चौधरी यांनी व्यक्त केला. & 8805221372